चिंदर (तेरई), २५ जून: चिंदर भटवाडी येथे ब्राह्मणदेव मंदिर आणि केळसकर घरासमोर विद्युत वाहिनीच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या आहेत. वीजेची लाइन चालू असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ महावितरण कंपनीकडे तक्रार केली असून लाइनमनला तातडीने पाठवण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, २४ तासांपासून परिसरात वीज पुरवठा बंद आहे. तुटलेल्या तारांमुळे महिलांसह लहान मुलांना घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “वायरमन ऑफिसमध्ये येईपर्यंत इथून जाणार नाही.” ग्रामस्थ आक्रमक झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. ब्राह्मणदेव मंदिरासारख्या धार्मिक स्थळाजवळ ही घटना घडल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



