कोकण, २५ जुलै : कोकणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हक्कांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांनी सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.
कोकरे म्हणाले, “देश आणि राज्यातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. अशा परिस्थितीत कोकणाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण, स्थानिकांना रोजगार, मत्स्यव्यवसाय, शेती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. ही संधी गमावल्यास भविष्यात कोकणासमोरील समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.”
त्यांच्या मते, कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्तावित अणुप्रकल्पांच्या विरोधात व्यापक लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही, यासाठी जनतेने जागरूक राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या माध्यमातून कोकणातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, लोकजागृती करणे आणि लोकशाही मार्गाने न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू राहील, असेही कोकरे यांनी सांगितले. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिकांना न्याय मिळावा आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र येऊन दबाव गट तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.



